गडचिरोलीच्या विकासासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मोर्चा;अंबादास दानवे यांची माहिती

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि. १७ जुलै)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देशभर सुरू असलेल्या ‘श्रीराम रक्षा आंदोलन’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी गुरुवारी कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शिवसेना युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली.
नागपूर येथे होणाऱ्या ‘श्रीराम रक्षा आंदोलनाला’ विदर्भातून मोठा जनसमर्थन मिळावे, यासाठी खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे विदर्भ दौऱ्यावर असून त्याच अनुषंगाने ते गडचिरोली येथे आले होते.पत्रकार परिषदेत बोलताना दानवे म्हणाले, “आज प्रभू श्रीराम आणि मंदिरांतील दानपेट्याही सुरक्षित नाहीत. याचे श्रेय भाजपने घ्यावे.” अशी टीका त्यांनी केली.
गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीवांचा वाढता प्रश्न, मानव-वन्यजीव संघर्ष आणि विकासाशी संबंधित विविध प्रश्न आदित्य ठाकरे स्वतः हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपवर निशाणा साधताना दानवे म्हणाले की, गडचिरोलीच्या नावावर राजकारण करण्यात आले; मात्र जिल्ह्याला अपेक्षित विकास मिळाला नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या या जिल्ह्याला न्याय मिळालेला नसून, पालकमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जिल्ह्याच्या विकासाकडे अपेक्षित लक्ष दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
गडचिरोलीत विमानतळ कुणासाठी
!!!
राज्यातील अनेक विमानतळे सुरू करून बंद झालेली असताना गडचिरोलीतील विमानतळ उभारण्याची घाई महाराष्ट्र सरकार कुणासाठी करत आहे असा सवालही त्यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख पवन गेडाम, विधानसभा संपर्कप्रमुख नंदू कुमरे,माजी जिल्हा परिषद सदस्या वेणूताई ढवगावे, हेमलता वाघाडे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
