
लोकशाही न्युज,सावली (दि. २ जुलै)
सावली तालुक्यात रानटी हत्तींच्या वाढत्या वावराने आणखी एका नागरिकाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्याहाड येथील अतुल गोहने वय -४० हे दुचाकीने सोनापूरकडे जात असताना व्याहाड–सोनापूर मार्गावर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक रानटी हत्ती आल्याचे सांगितले जात आहे. समोर हत्ती दिसताच त्यांनी प्रसंगावधान राखत दुचाकी रस्त्यावरच सोडली आणि जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, संतप्त हत्तीने त्यांचा पाठलाग करून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या भीषण हल्ल्यात अतुल गोहने यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेने संपूर्ण सावली तालुक्यात शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
गेल्या अनेक आठवड्यांपासून सावली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा मुक्त संचार सुरू आहे. हत्तींकडून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाच आता मानवी जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही अनेक गावांमध्ये हत्तींचा वावर आढळून आला असून, नागरिकांमध्ये सतत भीतीचे वातावरण आहे.
या घटनेनंतर वनविभागाच्या उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. हत्तींच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण, नागरिकांना वेळेवर इशारे आणि संवेदनशील भागात तातडीने सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी परिसरातून होत आहे.दरम्यान, हत्तीच्या हल्ल्याबाबतची माहिती प्राथमिक स्वरूपाची असून, घटनेचा नेमका तपशील आणि मृत्यूचे कारण वनविभागाच्या अधिकृत तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
हत्तीचा एक कळप चंद्रपूर जिल्ह्यात तर दुसरा कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल
!!
मागील दोन ते तीन महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीच्या कळपातील अर्धे हत्ती गडचिरोली जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत.
