उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज प्रतिनिधी
सावली, तालुक्यातील हरांबा, लोंढोली, जिबगाव, साखरी मार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले असून, मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाचे दिवस आहेत. मोठ्या खड्यात नेमके पाणी किती आहे हे लक्षात येत नाही. हेच खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
जिबगाव, हरांबा परिसरातील नागरिकांना अनेक कामासाठी सावलीत यावे लागते. सावलीत शाळा, महाविद्यालय, दवाखाना
बाजारपेठ, शासकीय आणि निमशासकीय कार्यालय आहे. त्यामुळे या गावांतील नागरिकांच्या सावलीत नेहमीच चकरा होत असतात. सावली हरांबा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण उखडले आहे दोन ते तीन फुटाचे खड्डे मार्गावर पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकास जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागतात. खड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. मात्र, रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुलर्क्ष होताना दिसत आहे. प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केले आहे.
