कारागृहात बंदिस्त नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण योजना लागू करा :
शेकापचे नेते भाई रामदास जराते यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकशाही न्युज (२ जुलै) :
राज्यातील विविध कारागृहात बंदिस्त असलेल्या अटकेतील नक्षलवादी, नक्षलसर्मथकांना शासनाची आत्मसमर्पण योजना लागू करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी शासनाकडे केली आहे.
भाई रामदास जराते यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातून आणि विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवादाचा जवळपास बिमोड झाला आहे. शासनाच्या प्रभावी प्रयत्नातून नक्षल संघटनेच्या वरिष्ठ जहाल पदाधिकाऱ्यांनी (कॅडर) आत्मसमर्पण केलेले आहे व मूळ प्रवाह स्वीकारलेला आहे. देशातून आणि आपल्या राज्यातून जवळपास संपुष्टात आलेला नक्षलवाद बघता व वरिष्ठ जहाल नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाची पार्श्वभूमी बघता राज्यातील विविध कारागृहात कैदेत असलेले अनेक सामान्य नक्षलवादी – नक्षल समर्थक यांना नक्षल संघटनेत काम केल्याबद्दल पश्चाताप होत असल्याची स्थिती, अटकेतील नक्षलवादी – नक्षल समर्थकाने जेलातून मला लिहिलेल्या पत्रातून दिसून येत आहे. त्यामुळे या नक्षलवादी, नक्षल समर्थकांनाही शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाई रामदास जराते यांनी केली आहे.
तसेच आतापर्यंत अनेक प्रकरणांत न्यायालयांनी अटकेतील नक्षलवादी – नक्षल समर्थकांना निर्दोष असल्याने किंवा पुरावा नसल्याने निर्दोष सुटका केलेले प्रमाण व अटकेत असलेले बहुतांश हे आदिवासी, अर्धशिक्षित आणि जेवण देणे, साहित्य ने – आण करणे असे काम करणारे असल्याचे लक्षात घेऊन अटकेतील नक्षलवादी – नक्षल समर्थकांनाही शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा लाभ देता येईल का? याबाबत पडताळणी करून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही भाई जराते यांनी व्यक्त केली आहे.
तसेच शेतकरी, कष्टकरी, कामगार, विस्थापितांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या डाव्या लोकशाहीवादी राजकीय पक्षांच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांना राजकीय द्वेष भावनेतून शहरी नक्षलवादी म्हणून हिणविण्याचा अपप्रचार करण्याचा प्रघात उदयास येत असून लोकशाही आणि संविधानिक मुल्यांची जोपासना होण्याच्या दृष्टीने शासनाने खरे नक्षलवादी आणि नक्षलसमर्थंकांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, राज्यात विशेषतः गडचिरोली संपुष्टात आलेला नक्षलवाद पुन्हा डोके वर काढू नये यासाठी शहरात राहून नक्षल संघटनेचे काम करणाऱ्याचा शासनाने बिमोड करावा व या कामी नक्षल संघटनेच्या आत्मसर्पण केलेल्या वरिष्ठ कॅडर कडून शासनास प्राप्त माहितीचा उपयोग करून निधी व शस्त्रपुरवठादारांच्या मुसक्या आवळण्याचे काम शासनाने करावे, अशी मागणीही भाई रामदास जराते यांनी केली आहे.
