देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा… बच्चू कडू यांची मागणी
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २५ सप्टेंबर)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री असताना जर शेतकऱ्यांना खत सुद्धा आपल्या शेतीत धानावर टाकण्याकरिता खत विकत मिळत नसेल तर त्यांनी तात्काळ आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी गडचिरोली येथे शेतकरी संवादासाठी आलेले प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री व माजी आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी (दि. २४ सप्टेंबर) रोजी सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेतुन केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खाणीतून येणाऱ्या उत्पन्नातून केवळ २५ टक्के खर्च जिल्ह्यातील विकास कामावरती खर्च केला तरी गडचिरोली जिल्हा बऱ्याच अंशी सुधारला जाईल.असे ही ते या प्रसंगी बोलले.भविष्यात शेतकऱ्यांकरिता येत्या हिवाळी अधिवेशनात गडचिरोली ते नागपूर पदयात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात येईल असा निर्धार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला .
पत्रकार परीषदेत बच्चू कडू म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे. पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षापासून आधारभूत मूल्याच्या नावाखाली फसवणूक होत आहे. एकंदरीत विचार केल्यास येथील धान उत्पादक शेतकरी दरवर्षी हेक्टरी १६ हजाराचा तोटा सहन करतो. मात्र राज्य सरकार याकडे लक्ष देत नाही. पण व्यापारी कंपन्यांना भरघोस मदत केली जात आहे. शेतकरी कर्ज माफ करायची वेळ येते तेव्हा तिजोरीत खडखडाट आहे सांगणाऱ्या सरकारकडून देशातील उद्योगपतींचे १७ लाख कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. रिलायन्ससारख्या कंपनीवरील ४८ हजार कोटीच्या कर्जाचा यात समावेश आहे. हे उद्योगपती देशातील सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे काम करत आहे.
आदिवासींच्या जमिनी भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात कायदा बनवण्यात येणार असल्याचे सांगितले. यावरून आदिवासींमध्ये तीव्र असून रोष आहे. ही व्यवस्था कुणासाठी? हे कळायलाच हवे. गडचिरोलीत मोठे उद्योग उभारण्यात येत आहेत. मात्र, यात किती स्थानिकांना रोजगार मिळाला हे देखील तपासणे गरजेचे आहे. खासगी कंपन्यांसाठी नियम, कायद्यांना बगल दिली जाते, पण गरीब शेतकऱ्यांना याच कायद्याचा धाक दाखवला जातो.
जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. शेतातील उभे पीक हत्ती नष्ट करत आहेत. सर्वसामान्य नागरिक जंगलात गेले की त्यांना वनकायद्याचा धाक दाखवण्यात येतो. मग रानटी हत्ती आमच्या शेतात येत असतील तर त्यांना तिथे येऊ न देण्याचे काम कुणाचे आहे. हत्तीसारखा प्राणी वनविभाग थांबवू शकत नसेल, तर हा विभाग आहे कशासाठी? शेतीची नुकसान रानटी हत्ती करत असतील तर दामदुप्पट मोबदला सरकारने दिला पाहिजे आणि वनविभागालाही वठणीवर आणले पाहिजे, असेही बच्चू कडू पत्रकार परीषदेत म्हणाले.
आज झालेल्या पत्रकार परिषदेला बच्चू कडू यांचे सह गडचिरोली जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक, बल्लू जवंजाळ व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
