
गडचिरोली (दि,३ सप्टेंबर)
कोरोना कालावधीनंतर बऱ्याच दिवसांनी गणेश मंडळावर असलेले निर्बंध हटविल्याने अनेक गणेश मंडळांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्यात उत्साह संचारणे स्वाभाविक आहे. परंतु अजूनही कोरोनाचे म्हणावे तसे समूळ उच्चाटन झालेले नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अजूनही अधून मधून कमी अधिक प्रमाणात कोरोनाचे पेशंट दवाखान्यात भरती होत असल्याचे वृत्तपत्रातून वाचायला मिळते. ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन गणेश मंडळांनी सावधगिरी बाळगायला हवी जेणेकरून या रोगाची साथ पून्हा पसरून शासनाला अकारण निर्बंध घालण्याची गरज पडणार नाही अशी अपेक्षा आहे. आताच काही दिवसांपूर्वी गडचिरोली चे एसडीपिओ मा. प्रणिल गील्डा साहेब व गडचिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. कतलाम साहेब यांनी मुर्तीकार, गणेश मंडळांचे पदाधिकारी, तालुक्यातील पोलिस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षांचे नेते यांची सामुहिक सभा आयोजित करुन आपापल्या परीने सामाजिक सलोखा व सामाजिक सुरक्षा आणि साथीच्या आजारांना आमंत्रण मिळेल असे कोणतेही कृत्य कोणाकडूनही केले जाणार नाही याची काळजी घेऊन गणेशोत्सव साजरे करण्यासाठी आवाहन केले होते. यावर्षी कोरोणाच्या सावटातून सुटका होते न होते तोच वरुण राजामुळे आपल्या शेतकरी बांधवांना व गोरगरिबांना पुराच्या संकटाचा सामना करावा लागला. गडचिरोली तालुक्यातील काही गावांमध्ये वाघानेही धुमाकूळ घातलेला आहे. लोकं शेतात जायला घाबरू लागली आहेत. अजून शेतातील माल शेतकऱ्यांच्या घरी यायचे आहे. एकीकडे महागाई दुसरीकडे हाताला रोजगार नाही आणि तिसरीकडे नैसर्गिक संकटे यात शेतकरी शेतमजूर सापडलेला आहे. सरकार कडून पाहिजे तसी मदत गरजूंना अजूनही मिळालेली नाही. जिथे “एक गाव एक गणपती” ही संकल्पना अमलात यायला हवी होती, पण अजूनही समाजात जागृती निर्माण न झाल्यामुळे या उपक्रमांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. मात्र काही गावे अपवादात्मक सापडतात तीच काय थोडीफार जमेची बाजू म्हणता येईल. विकासात्मक बाबी डोक्यात यायला जरा उशीर लागते पण ते चिरकाल टिकणारे असते. महा अंनिस ने जेव्हा पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची भुमिका घेतली तेव्हा अनेक ठिकाणी सनातन्यांनी प्रचंड विरोध केला. जेव्हा ही गोष्ट जनहिताची वाटली तेव्हा सर्वोच्च न्यायालय व सरकारने देखील ती बाजू उचलून धरली आणि आज तीच बाब समाजानेही स्विकारली. आज शहरात मोठ्या प्रमाणात घरच्या घरी मुर्त्यांचे विसर्जन करून गणेश विसर्जनानंतर शिल्लक राहीलेले सर्व साहित्य परस बागेतील झाडाझुडुपांना अर्पण करून त्याचा सदुपयोग केला जाते आहे ही आनंदाची व समाधानाची बाब आहे. गणेश मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी समाजातील लोकांसाठी जनप्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून त्या योगे समाजातील काही जून्या रुढी परंपरा व वाईट चालीरिती, (खर्रा गुटखा, दारू या सारखी) व्यसने , अंधश्रद्धा आदींना घालविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करून गावाचा विकास साधेल अशा बाबींना प्राधान्य द्यावे. गणेशोत्सव हे केवळ लोकांचे करमणुकीचे/मनोरंजनाचे साधन न बनता ते प्रबोधनाचे केंद्र व्हावे असे आवाहन महा अंनिसचे कार्यकर्ते श्री विलास निंबोरकर यांनी केले आहे.
जाहिरात
