मन की बात’ हा राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा देणारा प्रभावी जनसंवादाचा मंच, माजी खासदार डॉ. अशोक नेते
'मन की बात' कार्यक्रमाच्या १३५ व्या भागाचे उत्साहात सामूहिक श्रवण

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२८ जून)
देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित ‘मन की बात’ या मासिक जनसंवाद कार्यक्रमाच्या १३५ व्या भागाचे आज गडचिरोली शहरातील शाहूनगर परिसरातील बूथ क्रमांक १०१ येथे उत्साहपूर्ण वातावरणात सामूहिक श्रवण करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांच्या गडचिरोलीतील निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, संजय बारापात्रे, दतु माकोडे, महादेव पिंपळशेंडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
देशहिताच्या विविध विषयांवर पंतप्रधानांचा प्रेरणादायी संवाद
!!!
‘मन की बात’च्या १३५ व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधताना अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. योगाच्या माध्यमातून भारताने जगात निर्माण केलेली नवी ओळख, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, नालंदा विद्यापीठाचा ऐतिहासिक वारसा, मेघालयातील ‘लिव्हिंग रूट ब्रिज’चे वैशिष्ट्य तसेच हरगील पक्ष्यांच्या संवर्धनासाठी झालेल्या जनसहभागाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर “पावसाचा प्रत्येक थेंब वाचवा, पाणी अडवा-पाणी जिरवा” असा संदेश देत जलसंधारणासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
‘मन की बात’ समाजाला सकारात्मक दिशा देणारा मंच – डॉ. अशोकजी नेते
!!
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते म्हणाले,
‘मन की बात’ हा केवळ रेडिओ कार्यक्रम नसून, देशातील सामान्य नागरिकांना राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणारा प्रभावी जनसंवादाचा मंच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत असून, या कार्यक्रमातून समाजातील प्रत्येक घटकाला सकारात्मक विचार, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळते.
ते पुढे म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्यातील प्रत्येक बूथवर ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण आयोजित करण्यात येत असून, पंतप्रधानांचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य भाजपचे प्रत्येक कार्यकर्ते करत आहेत.
कार्यक्रमानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी राष्ट्रहित, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी, युवा सक्षमीकरण आणि जनसहभाग या विषयांवर सखोल चर्चा केली. पंतप्रधानांनी मांडलेल्या विचारांमुळे समाजहिताच्या उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन बूथ क्रमांक १०१ च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.
