खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी वेधले रेल्वे विकासाच्या संदर्भात सभागृहाचे लक्ष
बंद असलेल्या रेल्वेगाड्या चालू करण्याची केली मागणी

लोकशाही न्युज गडचिरोली (दि,२४ जुलै)
मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न प्रलंबीत असून प्रत्यक्षात रेल्वे चे काम संथगतीने सुरु असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोरोना काळापासून बल्लारशाह – वडसा – गोंदिया मार्गावरील काही ट्रेन बंद आहे, त्यामुळे या मार्गांवर आवागमन करणाऱ्या नागरिकांना अडचणीना सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे सिरोंचा, अहेरी भागातील रस्ते खराब असल्याने व नागपूर चा प्रवास या मार्गाने लांब होत असल्याने या भागातील नागरिक काजीपेठ मार्गे, काजीपेठ – अजनी पॅसेंजर ट्रेन ने प्रवास करून नागपूर प्रवास करीत होते मात्र ती ट्रेन सुद्धा कोरोना काळात बंद केल्यापासून अद्याप सुरु केली नसल्याने अहेरी -सिरोंचा परिसरातील नागरिकांना आवागमना करण्याकरीता त्रास होत आहे.
वडसा ते चांदा फोर्ट, चांदा फोर्ट ते गोंदिया, गोंदिया ते रायपूर, काझीपेठ ते अजनी(नागपूर) या गाड्या कोरोना काळापासून बंद आहेत, त्या गाड्या पूर्ववत सुरु करण्यात यावे, गडचिरोली -वडसा, नागभीड – नागपूर रेल्वे चे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे व वडसा आणि अन्य महत्वाच्या ठिकाणी जिथे रेल्वेच्या खाली भुयारी मार्ग तयार करण्यात आले तिथे पावसाळ्यात तुडुंब पाणी भरत असल्याने लोकांना प्रवासाकरीता अडचण निर्माण होत असते अश्या ठिकाणी प्रभावी उपाय योजना करण्याची मागणी गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कडे केली आहे.
