
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १७ मे)
जिंदाल उद्योग समूह (जेएसडब्लू) देसाईगंज, वडसा तालुक्यात स्टील उद्योग उभारणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची २ हजार ३०० हेक्टर सुपीक जमीन कवडीमोल भावात घशात घालण्याचा डाव आखात असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेतील गटनेते व ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.१७) सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स येथे पत्रकार परिषदेत केली.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, जिंदाल उद्योग समूह देसाईगंज, वडसा तालुक्यात स्टील उद्योग उभारणार असून, त्यासाठी २ हजार १२८ हेक्टर खासगी व १७४ हेक्टर सरकारी अशी एकूण २ हजार ३०३ हेक्टर जमीन अधिग्रहीत करणार आहे. खासगी जमीन शेतकऱ्यांची असून, ती इटिया डोह प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली आहे. त्या शेतीत शेतकरी बारमाही पीक घेत आहे, नव्या दरानुसार, शेतजमिनीला किमान चारपट भाव मिळणे अपेक्षित आहे. परंतु या समुहाने आपले दर निश्चित केले असून, ते शेतकऱ्यांना परवडणारे नाही. भविष्यात या उद्योगात १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असे सरकार आणि हा उद्योग समूह सांगत असेल तर गुंतवणूक टप्प्याटप्प्याने येणार असेल तर जमीनसुद्धा टप्प्याटप्प्यानेच अधिग्रहीत करावी जेणेकरुन शेतकऱ्यांना भविष्यातील दर मिळेल.
या उद्योगामुळे आठ गावे होणार प्रभावीत
!!!
या उद्योगामुळे कोंढाळा, कुरुड, वडसा, नैनपूर, तुळशी, कोकळी, शिवराजपूर, वडेगाव इत्यादी ८ गावे बाधित होणार असून ४ गावांचे पुनर्वसन करावे लागणार आहे.
पत्रकार परिषदेला गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष राम मेश्राम, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
