
लोकशाही न्युज,गडचिरोली(दि,४ मार्च)
संपूर्ण भारतात आझादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात प्रशासनातर्फे साजरा करण्यात येत आहे. तसेच देशाचे प्रधानमंत्री यांनी २०२३-२४ पर्यंत प्रत्येक गरजू व्यक्तींना स्वत:चे पक्के घर देण्याचा निर्धार केला आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाच्या काही कागदोपत्री नियंमामुळे पंतप्रधान आवास योजना शहरीचे प्रलंबित प्रस्ताव मंजुर झालेले नाही. त्यामुळे अनेकांना उघड्यावर संसार करावा लागत आहे. सदर प्रलंबित प्रस्तावांना तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी आज ३ मार्च रोजी धानोरा नगरपंचायत पदाधिकाऱ्यानी जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सदर निवेदन देतांना नगराध्यक्षा पौर्णिमा सयाम, उपाध्यक्ष ललित बरछा, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी,नपं सभापती नरेश चिमूरकर, नगरसेवक कालीदास मोहुर्ले, नगरसेविका सीमा थूल, आवास योजनेचे अभियंता अक्षय उके तसेच आवास योजनेपासून वंचित असलेले लाभार्थी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत नगरपंचायत धानोरा क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांना घरकूलाचा लाभ मिळावा. याकरिता नगरपंचायत धानोरा येथील पदाधिकारी हा प्रामाणिक हेतू घेऊन आज जिल्हाधिकारी यांच्याकडे उपस्थित झाले.
यावेळी संदर्भ क्रमांक १ या परिपत्रकानुसार मुद्दा क्रमांक ३ मधील नागरी भागात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरत असलेल्या व राज्य शासनाच्या नागरी भागात असलेल्या जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या अतिक्रमण धारकांची अतिक्रमणे नियमाकूल करण्याबाबत वाचा येथील क्र. २ व ३ येथील शासन निर्णयामध्ये स्वयंस्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत. सदर परिपत्रकानुसार गावठाणातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येतील. परंतु सदरहूल कार्यवाहीस बराच विलंब होत असून या विलंबामुळे गरजू लोकांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे गावठाणातील अतिक्रमण तत्काळ नियमाकूल करण्याची कार्यवाही करून गावठाणातील अतिक्रमणे नियमानुकूल असल्याचे गृहीत धरून अतिक्रमण धारकांना संदर्भ क्र. २ च्या परिपत्रकानुसार घरकुल मंजूर करण्यात यावी.
तसेच धानोरा येथील गावठाण मोजणी १९८० मध्ये होऊन नागरिकांना शासनाकडून सनद प्रदान करण्यात आली. तेव्हापासून जवळपास ४२ वर्षाचा कालावधी लोटला असून गावठाणातील प्रत्यक्ष मालमत्तेवर अनेक प्रकारचे हस्तांतरण व ताबे वहीवाटीमध्ये बदल झालेला आहे. अधिग्रहणरीत्या अभिलेखात बदल करण्यास अडचणी निर्माण होत असल्याने गावठाणची पूर्णमोजणी करून गावठान अभिलेख अद्यावयात करणे गरजे आहे. जेणेकरून नागरिकांचे खासगी व शासकीय कामे सुरळीत होतील, अशी मागणी धानोरा नगरपंचायतच्या पदाधिकाºयांना जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
संजय मीना,जिल्हाधिकारी गडचिरोली
सदर निवेदनाची दखल घेऊन येत्या १० एप्रिल पर्यंत अतिक्रमणधारकांना नियमाकूल करून अतिक्रमणधारकांना पट्ट्याचे वाटप करून घरकुलाबाबतचे प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. तसेच गावठणची पूर्नमोजणी करून गावठाण अभिलेख अद्यावत करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात येईल, जेणे करून लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळेल, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी धानोरा नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्याना दिले.
