जाहिरात
दुःखद ब्रेकिंग न्युज

गडचिरोली : विषारी सर्पदंशाने ३ विद्यार्थिनीचा मृत्यू, तिघींची प्रकृती चिंताजनक

जपतलाई अनुदानित आश्रम शाळेतील घटना

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली/धानोरा (दि. १० ऑगस्ट २०२६)

धानोरा तालुका मुख्यालयापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या जपतलाई अनुदानित आश्रम शाळेमध्ये काल (दि. ९ ऑगस्ट) मध्यरात्री ३ च्या सुमारास झालेल्या विषारी सर्पदंशाने ३ विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे.

विषारी सर्पदंशाने मृतक झालेल्या विद्यार्थ्यांची नावे अनुक्रमे दीपिका लकळा रा. जवेली वर्ग ६ वा , सुश्मिता मंडल रा.मेटरी एटापली वर्ग वर्ग ८ वी , अनु कोरेटी रा.केहकवाही वर्ग २ रा या ३ विद्यार्थिनींचा धानोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये मृत्यू झाला.

समृद्धी नैताम रा.रांगी वर्ग ८ वी, दीपिका मडावी रा.केहकवाही वर्ग ५ वी, कविता किरंगा रा.मेटरी वर्ग ६ वी या मुलींची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आल्याची माहिती आहे.

अविष्यन्त पंडा, जिल्हाधिकारी, गडचिरोली
!!
जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेतील अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून, “सर्पदंश प्रतिबंधक औषधाचा”(अँटी व्हेनम) पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि उपचाराधीन तिन्ही विद्यार्थिनींना तातडीने सर्पदंश प्रतिबंधक औषध देण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहू नये आणि विद्यार्थिनींची विशेष काळजी घेण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत.

आश्रमशाळेतील सुरक्षाव्यवस्थेची सखोल तपासणी
!!!
जपतलई येथील संबंधित आश्रमशाळा ही अनुदानित असून तिला शासनाकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे निवासी विद्यार्थ्यांची सुरक्षितता, आरोग्य तसेच आवश्यक मूलभूत सुविधा सुनिश्चित करण्याची जबाबदारी संबंधित संस्था आणि व्यवस्थापनाची आहे. या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना नेमकी कशी घडली, विद्यार्थिनींच्या निवासस्थानी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का तसेच आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील आवश्यक नियम व उपाययोजनांचे पालन करण्यात आले होते का, या बाबींची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या पथकांकडून घटनास्थळाची पाहणी करून संबंधितांकडून आवश्यक माहिती घेतली जाणार आहे. चौकशीअंती निष्काळजीपणा अथवा सुरक्षाविषयक त्रुटी आढळून आल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून दोषींविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडून शोक व्यक्त
!!
जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनीही या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करून मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. उपचाराधीन विद्यार्थिनींना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार आणि सहकार्य उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

दरम्यान, उपचाराधीन तिन्ही विद्यार्थिनींच्या प्रकृतीवर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागाच्या पथकांकडून करण्यात येणाऱ्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे संबंधितांची जबाबदारी निश्चित करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button