गडचिरोली : रास्त भाव दुकानांमधून निकृष्ट दर्जाच्या गहू व तांदळाचे वितरण
रुपेश वलके यांनी केली चौकशीची मागणी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १३ जून)
गडचिरोली तालुक्यातील अनेक रास्त भाव दुकानांमधून गेल्या तीन महिन्यांपासून थेट वाहतूक योजनेद्वारे पुरविण्यात येणारा गहू व तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.अनेक लाभार्थ्यांनी तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात कण्या, तुटलेले दाणे व निकृष्ट प्रतीचे धान्य असल्याची तक्रार केली आहे. तसेच वाटपासाठी येणारा गहू हा मागील वर्षी पावसात भिजलेला व नंतर वाळवून साठवलेला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना दर्जेदार धान्य मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांना निकृष्ट धान्याचे वितरण होत असल्यास ही अत्यंत गंभीर बाब असून याची तात्काळ चौकशी होणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रास्त भाव दुकाने कार्यरत असून गडचिरोली जिल्ह्यातही मोठे जाळे आहे.
सामाजिक कार्यकर्ता रुपेश वलके यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी व संबंधित प्रशासनाकडे मागणी केली आहे की, १.गडचिरोली तालुक्यातील सर्व रास्त भाव दुकानांमध्ये पुरविण्यात आलेल्या गहू व तांदळाचे नमुने तात्काळ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावेत. २.थेट वाहतूक योजनेद्वारे धान्य पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी करण्यात यावी.३.निकृष्ट धान्याचा पुरवठा करणाऱ्या संबंधित अधिकारी व पुरवठादारांवर कारवाई करण्यात यावी.
४.लाभार्थ्यांना दर्जेदार धान्य उपलब्ध करून देण्यात यावे.
५.चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित धान्यसाठ्याचे वितरण थांबवून पर्यायी दर्जेदार धान्य उपलब्ध करून द्यावे.
प्रशासन व संबंधित अधिकारी या गंभीर विषयावर मौन का बाळगत आहेत, असा सवालही रुपेश वलके यांनी उपस्थित केला असून गरीब जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी रुपेश वलके सामाजिक कार्यकर्ता यांनी केली आहे.
