
लोकशाही न्युज, आरमोरी(दि,१ डिसेंबर)
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व जनतेच्या विविध समस्या अवगत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना आरमोरीचे तहसीलदार यांचेमार्फत अखिल भारतीय किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने माकपा जिल्हा सचिव काॅम्रेड अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ ला निवेदन पाठविण्यात आले.
दिलेल्या निवेदनात धानाला ३५०० रूपये हमीभाव देण्यात यावा व त्वरित धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांची शेतीचे नुकसान झाले त्यांना त्वरित मदत देण्यात यावी, हत्ती व वाघाच्या हल्ल्यात बळी पडून मृत्यू झालेल्यांना आणि पिकाच्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्यात यावी व जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, शेतकरी हिताचा स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, साठ वर्षावरील सर्व शेतकरी, शेतमजूर, कामगार, संघटित कामगार यांच्याकरिता पेन्शनचा कायदा करून प्रतिमाह रुपये ५ हजार देण्यात यावेत, शेतीसाठी पुरेसा व नियमित विजेचा दिवसा व मोफत पुरवठा करण्यात यावा, प्रलंबित वन हक्क दावे मंजूर करण्यात यावे, बेकायदेशीर लोहखानी सुरजागड, झेंडेपार मंजूर व प्रस्तावित लोहखानी तात्काळ बंद करण्यात याव्यात, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी,आरमोरी शहरातील सर्व झोपडपट्टी कायम करून जागेचे प्रॉपर्टी कार्ड आणि गरजूंना घरकुलांचा तातडीने लाभ देण्यात यावा, पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसच्या किमती कमी करून महागाई कमी करण्यात यावी ,आरमोरी नगरपरिषद व आरमोरी तालुक्यातील प्रत्येक गावात रोजगार हमीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, विज बिल विधेयक २०२२ व वनसंवर्धन नियम २०२२ रद्द करण्यात यावा, संजय गांधी व श्रावणबाळ निराधार लाभार्थ्यांना रुपये ५ हजार प्रतिमाह पेन्शन देण्यात यावी अशा मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देतांना कम्युनिस्ट कार्यकर्ते राजू सातपुते,भगवान राऊत, किसन राऊत, बाबुराव मोहुर्ले, मधुकर राऊत, अक्षय राऊत, खटुजी कुळे,गुरुदेव जराते, विनोद राऊत ,शालिग्राम भोयर, मारुती गुरनुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते.
