कोठी–कोरणार पुलिया प्रकरणी १९ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.१८ ऑगस्ट २०२६)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेली कोठी–कोरणार पुलिया २९ जुलै रोजी कोसळून २० दिवस उलटले, तरीही संबंधित अधीक्षक अभियंता व कंत्राटदारावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. केवळ अधीक्षक अभियंत्यांचा अतिरिक्त पदभार काढून घेणे ही कारवाई नसून, या गंभीर प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप आजाद समाज पार्टीने केला आहे.
या प्रकरणी आजाद समाज पार्टीने ५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित अधीक्षक अभियंता व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, शासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने आता १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे घेराव व चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून “जिल्हाधिकारी जवाब दो!” अशी भूमिका घेत दोषी अधीक्षक अभियंत्यांना तात्काळ निलंबित करावे, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
