गडचिरोली : शिवसेना (उबाठा पक्ष) जिल्हा संपर्क कार्यालय उदघाट्न व भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न
शिवसेना सचिव विनायक राऊत यांची उपस्थिती

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. १७ ऑगस्ट २०२६)
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या गडचिरोली जिल्हा संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शिवसेना सचिव तथा माजी केंद्रीय मंत्री विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोलीच्या दयनीय अवस्थेवर राऊत यांचे सरकारवर टीकास्त्र
मेळाव्याला मार्गदर्शन करताना विनायक राऊत यांनी भारतीय जनता पार्टी आणि विद्यमान राज्य सरकारवर जोरदार टीका केली. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतानाही जिल्ह्याची अवस्था दयनीय असल्याचा आरोप त्यांनी केला.
नुकत्याच आश्रमशाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना सर्पदंश होऊन झालेल्या जीवितहानीचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांनी या घटनेसाठी शासनाच्या यंत्रणेला जबाबदार धरले. आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना आणि प्रशासनाची जबाबदारी याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
गडचिरोलीतील मूलभूत सुविधांच्या प्रश्नावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असलेल्या जिल्ह्यात थोडासा पाऊस आला तरी विद्युत प्रवाह खंडित होतो,”अशी उपरोधिक टिप्पणी करत त्यांनी वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर सरकारची खिल्ली उडवली. या टिप्पणीवर उपस्थितांमध्ये हास्याची लहर उमटली.
गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असून, सरकारकडून विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे राऊत यांनी सांगितले. जनतेच्या प्रश्नांवर शिवसेनेने आक्रमकपणे भूमिका घेत सरकारला जाब विचारला पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पक्षाची खरी ताकद कार्यकर्त्यांमध्ये असून, पदाधिकारी व शिवसैनिकांनी जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करावा, असे त्यांनी सांगितले.
नव्या पदाधिकाऱ्यांवर विश्वासाचा शिक्कामोर्तब
!!!
यावेळी पक्षाकडून नुकत्याच जाहीर झालेल्या नव्या नियुक्त्यांचाही उल्लेख करण्यात आला. डॉ. श्रीकांत बनसोड यांची सहसंपर्क प्रमुखपदी, पवन गेडाम यांची जिल्हाप्रमुखपदी आणि दिलीप सुरपाम यांची अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुखपदी झालेली नियुक्ती ही पक्षाने नव्या नेतृत्वावर दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे नमूद करण्यात आले. या नव्या जबाबदाऱ्यांमुळे जिल्ह्यातील संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नव्या पदाधिकाऱ्यांनी सर्व स्तरांवरील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन मजबूत करण्यासोबतच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाला शिवसेना सचिव विनायक राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारी, नागपूर महानगर संपर्कप्रमुख सतीश हारडे सहसंपर्कप्रमुख डॉ. श्रीकांत बनसोड, जिल्हा संघटक जिल्हाप्रमुख पवन गेडाम व अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम, नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख उत्तम कापसे युवा सेना विस्तारक शुभम सोरते, जिल्हा संघटक विलास ठोंबरे तालुका संघटक नंदू कुमरे गडचिरोली शहरप्रमुख पप्पू शेख, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुकाप्रमुख, माजी लोकप्रतिनिधी, माजी पदाधिकारी तसेच युवासेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
