भूता बद्दलचा समाजात असलेला गैरसमज दूर करण्यासाठी चातगाव येथील स्मशानभूमीत साजरी होणार कोजागिरी
महा अंनिस शाखा गडचिरोली चा नवोपक्रम

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१६ ऑक्टोबर)
महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात कुठे ना कुठे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. स्मशानभूमीत कुठे स्नेह भोजन तर कुठे परिवार मिलन सोहळा तर कुठे कौटुंबिक मेळावा. सदर कार्यक्रमातील खासियत असते ती त्या त्या ठिकाणातल्या उपक्रमांच्या वैविध्यता. असाच एक नवोपक्रम म्हणजे स्मशानभूमीत पौर्णिमेला कोजागरी साजरी करणे.
चातगाव येथे महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने काही दिवसांपूर्वीव्यसन मुक्ती व अंंधश्रद्धा निर्मूलन संबंधी जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले. त्यात अंंधश्रद्धा कशा पद्धतीने जोपासल्या जातात व त्यातून समाजाची कशी अधोगती होते हे पटवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले व काही चमत्कारावर आधारित प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले. केवळ आपल्या जिल्ह्यातच नाही तर जगाच्या पाठीवर असलेल्या कोणत्याही देशात भूत, भानामती, करणी, मंत्रशक्ती, दैवीशक्ती, चेटुक व जादुटोणा यांचे अस्तित्व नाही असेही मार्गदर्शन करताना सांगण्यात आले.
तेव्हा तेथील काही महिला मंडळी, पुरुष तथा युवकांकडून ऐकावयास मिळाले की, कुठे असतील नाही तर नसतील पण चातगाव येथील स्मशानभूमीत पौर्णिमेला आवर्जून काही मांत्रिक, पुजारी व ज्यांच्या अंगात देवी येतात त्या मंडळींकडून भूतांना जागृत करून उठवून दिले जाते. व ही गोष्ट खरी आहे. तेव्हा महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्या कार्यक्रमात येत्या पौर्णिमेला कोजागरी साजरी करुणच दाखवू असे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाची पुर्तता करण्यासाठी महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून अशा मांत्रिक, पुजारी, व दैवी शक्तीने भूत उठवणाऱ्यांना केवळ चातगावच नाही तर जगभरात कुठेही भूत नाही हे दाखवून देण्यासाठी व समाजात असलेला भूत पिशाच्च बद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी दि.१७ ऑक्टोबर २०२४ ला चातगाव येथील स्मशानभूमीत महा अंनिस तर्फे प्रथमच पौर्णिमेच्या दिवशी कोजागिरी साजरी करण्याचे आयोजन केले आहे. यात जवळपास काही विद्यार्थी, शिक्षक व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, महिला आणि महा अंनिस चे कार्यकर्ते असे किमान पन्नास ते सत्तर कार्यकर्ते सहभागी राहणार आहेत असे महा अंनिस शाखा गडचिरोली तर्फे पत्रकाद्वारे कळविले आहे.
