‘एक हात मदतीचा’ उपक्रमातून सिनेट सदस्य तनुश्री आत्राम पोहचल्या १ लाख नागरिकांपर्यंत

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२६ जुलै)
केवळ जनसामान्य लोकांच्या लोकसेवेच्या भावनेतून गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सुरु केलेला ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम अवघ्या अडीच वर्षांत एक लाख लोकांपर्यंत पोहचला आहे.त्यामूळे लाखो लोकांना या उपक्रमातून फायदा झाला आहे.या उपक्रमातून सिनेट सदस्या तनुश्री आत्राम या जवडपास १ लक्ष लोकांपर्यंत पोहचल्या आहेत.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कनिष्ठ कन्या तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांनी अडीच वर्षांपूर्वी नवरात्रीच्या शुर्भ पर्वावर ‘एक हात मदतीचा’ हा लोककल्याणकारी उपक्रम नि:स्वार्थ भावनेने सुरु केला. सुरुवातीला अहेरी उपविभागात लोकप्रिय झालेल्या या उपक्रमाने हळूहळू गडचिरोलीपर्यंत व्याप्ती गाठली. तनुश्री यांनी गरजू नागरिकांना विनामूल्य आभा कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र अशी महत्वाची कागदपत्रे काढून देण्यासाठी मदत करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. पाहतापाहता ही बातमी दूरदूरपर्यंत पोहचली आणि आता स्वत:हून नागरिक त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडीअडचणी सांगू लागले. एवढेच नाही तर गावात येण्याची विनंतीही करु लागले. त्यानुसार तनुश्री आत्राम गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधू लागल्या.
यासंदर्भात तनुश्री आत्राम यांनी आज ‘मीट द प्रेस’ कार्यक्रम घेऊन डिजीटल मीडियाच्या पत्रकारांशी संवाद साधला.त्या प्रसंगी या उपक्रमाची माहिती पत्रकारांना देतांना त्या बोलत होत्या. महत्वाची कागदपत्रे काढून देताना महिला, युवक, युवती, शेतकरी, मजूर हे आपल्या समस्या सांगू लागले आहेत. त्यानुसार वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना पट्टे मिळवून देणे, विश्वकर्मा योजनेंतर्गत महिलांना शिलाई मशिन, कामगार योजनेंतर्गत कीट, लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन देणे यासह अनेक उपक्रम त्या राबवित आहेत.
या कामांच्या माध्यमातून आपण जवळपास एक लाख लोकांशी जोडले गेलो. अलीकडे अनेक गावांना पूर आल्याने नागरिकांचे नुकसान झाले. काही जणांचे घर क्षतीग्रस्त झाले, त्यांनाही आपण मदतीचा हात दिला. एखादे काम झाल्यानंतर गोरगरीब नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना मोठे समाधान मिळते, असे तनुश्री आत्राम यांनी सांगितले. निवडणुका येतील आणि जातील, पण आपले लोकसेवेचे काम अविरतपणे सुरु राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
