जाहिरात
दिन-विशेष

नवरात्रोत्सव विशेष,सुसंसकारमय उत्सव: नवरात्रोत्सव!

Spread the love

गडचिरोली (दि,३ ऑक्टोंबर)

_नुकताच गणेशोत्सव पार पडला आहे. तर आता सद्या नवरात्रोत्सव सुरू आहे. माझ्यासारख्या खा खा खाणाऱ्या खादाडाची मोठीच चंगळ आहे. मागील एका लेखात “काला- का आलाय?” अर्थात मनुष्यजन्म हा अतिदुर्लभ आहे. मानवाने तो सत्कारणी लावला पाहिजे. तो सांप्रत सद्गुरूच्या सान्निध्यात ईश्वरप्राप्ती करून मानवता अंगी बाणविण्यासाठी व सद्वर्तनी जीवन जगण्यासाठी या मृत्यूलोकात आला- त्याचा जन्म झाला आहे. मात्र आपण याच महत्त्वाच्या गोष्टीची गफलत करून बसतो. “खाण्यासाठी जन्म आपला!” एवढाच गर्भितार्थ घेऊन सोन्यासारखा नव्हे त्याहूनही अनमोल नरजन्म- मानवी जीवन मातीमोल करून टाकतो. हा दृष्टांत या शारदीय नवरात्रोत्सव निमित्त महान चिकित्सक वाचकांपुढे सविनय सविस्तरपणे श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी ठेवत आहेत… संपादक._

भारत देश संतांची भूमी आहे. इतर जीवांपेक्षा मानवावर अगदी बालपणापासून नानाविध सुसंस्कार टाकले जातात. माणूस हा खरोखर माणसासारखाच वागावा, हाच त्यातील उद्देश असतो. येथील सोहळे, सण, समारंभ, उत्सव वगैरे माणसाला सुसंस्कारित करण्याच्या उद्देशानेच योजलेले आहेत. तो कदापिही वाममार्ग चोखाळू नये, हाच त्यांमागील शुद्ध सात्विक भाव आहे. म्हणून सणोत्सवांत काला- गोपाळकाला फोडण्यात येत असतो. काला या शब्दातून माणसाला त्याच्या जन्माचे खरे प्रयोजन काय असावे? हे कळावे म्हणूनच योजलेले असते, हे पटते. नुकताच गणेशोत्सव पार पडला आहे. तर आता सद्या नवरात्रोत्सव सुरू आहे. माझ्यासारख्या खा खा खाणाऱ्या खादाडाची मोठीच चंगळ आहे. मागील एका लेखात “काला- का आलाय?” अर्थात मनुष्यजन्म हा अतिदुर्लभ आहे. मानवाने तो सत्कारणी लावला पाहिजे. तो सांप्रत सद्गुरूच्या सान्निध्यात ईश्वरप्राप्ती करून मानवता अंगी बाणविण्यासाठी व सद्वर्तनी जीवन जगण्यासाठी या मृत्यूलोकात आला- त्याचा जन्म झाला आहे. मात्र आपण याच महत्त्वाच्या गोष्टीची गफलत करून बसतो. “खाण्यासाठी जन्म आपला!” एवढाच गर्भितार्थ घेऊन सोन्यासारखा नव्हे त्याहूनही अनमोल नरजन्म- मानवी जीवन मातीमोल करून टाकतो. पुरुषजन्म व स्त्रीजन्म यात भेद करतो. स्त्री हीनदीन तर पुरुष महान व भाग्यवान समजून गैरसमज करून वागतो. दोन्ही देहातील आत्मा एकरस व एकसमान असतो; तो पुरुष अथवा स्त्री मुळीच रहात नाही. भेद असतो तो फक्त त्यांच्या शरीरात! हेच सद्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवातून दिसून येईल, मात्र तशी भावना प्रकाशित झाली पाहिजे. जसे म्हटलेय-
“इक नूर हैं सब दे अन्दर, नर हैं चाहे नारी ए| बामन खतरी वैश्य हरिजन, इक दी खलकत सारी ए||”
नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. प्रारंभी तो एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्थंडिलावर नऊ धान्याची पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. ही प्रथा या सणाचे कृषिविषयक स्वरूप व्यक्त करते. पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला. “हे जगदंबे, तू सर्व जगाची आई आहे आणि या चराचरामध्ये ज्या स्त्रिया आहेत, त्या तुझ्या स्वरूप मातृरूप आहे; त्या जगदंबेला मी साष्टांग वंदन करतो.” हे पटू लागले-
“यादेवी सर्वेभूतंषू मातृरूपेण संस्थितः। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।”
नवरात्रात विशेषकरून देवीची उपासना करायला पाहिजे. हे विशेषतः चैत्र आणि अश्विन या पवित्रता महिन्यात भक्तीपूर्वक देवीची आराधना व्हायला पाहिजे. नवरात्राला अकालबोधन नवरात्र असे म्हटले जाते. प्रतिपदेला पहाटे उठून स्नानादिक विधी आटोपून व सर्वप्रकारची मांगलिक तयारी करून ब्राह्मणाच्या हस्ते घटस्थापना केली जाते, तसेच सप्तशती चरित्रातील हा श्लोक काय सांगतो? ते आपण पाहू या-
“प्रथम शैलपुत्री ती, व्दितीयं ब्रह्मचारिणी। तृतीयं चंद्रघण्टेति, कुष्माण्डेती ती चतुर्थकम्। पंचमं स्कंन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च। सप्तमं कालरात्रीच महागौरी ति चाष्टकम।। नवमं सिध्दिरात्री च नवदुर्गाः प्रकीर्तीताः।”
या भगवतीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात. दुसऱ्या रूपाला ब्रह्मचारिणी, तिसऱ्याला चन्द्रघण्टा, चौथ्याला कृष्मांडा, पाचव्याला स्कंदमाता, सहाव्याला कात्यायनी, सातव्याला कालरात्री, आठव्याला महागौरी आणि नवव्याला सिद्धीदात्री अशा या नऊ दिवसात निरनिराळ्या नऊ रूपांमध्ये ती वावरत असते. दहाव्या दिवशी ती शुभनिशुंभ या राक्षसांचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते. अशी या देवीची ही नऊ रूपे आपण बघितल्यानंतर, तिचे जे नऊ दिवसांचे आपल्या घरातले जे मंगलमय वास्तव्य असते, त्यात कोणी उपवास, एकभुक्त व्रत किंवा यापैकी एका व्रताचा नियम करून तिची आराधना केली जाते. नऊ कुमारिकेचे पूजन, सप्तशती पाठ कुंकुमार्चन, श्रीसुक्त पाठ, ललीतासहस्त्र नामावली आणि आपली जी परंपरागत चालत आलेली कुलदेवता आहे, तिचा जप हे जास्तीत जास्त केल्यास त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते-
“अन्नादभवंन्ति भूतानि पर्जन्याद अन्न संभवः! यज्ञादभवंत्नि पर्जन्यो यज्ञकर्मसमुद्भवः!!”
श्रीकृष्णाने गीतेत वर्णन केल्याप्रमाणे यज्ञ केल्यास आणि त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी झाल्यास त्या यज्ञाचे फळ शतपट इतके प्राप्त होते. म्हणून या नवरात्रामध्ये हवन यज्ञाला आपल्या पूर्वजांपासून एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच ज्या कुमारिकांना भोजन दिले जाते त्यांना सुद्धा त्यांच्या वयानुसार देवीच्या वेगवेगळ्या रूपांनी संबोधिले जाते. कुमारिका कमीत कमी दोन वर्षांची असली पाहिजे. त्याआधी तिचे पूजन चालत नाही. तीन वर्षांच्या कुमारीला त्रिमूर्ती, चार वर्षाच्या कुमारिकेला कल्याणी, पाच वर्षाच्या कुमारीला रोहिणी, सहा वर्षाच्या कालिका, सात वर्षांच्या कुमारिला चंण्डिका, आठ वर्षाच्या कुमारीला शांभवी, नऊ वर्षाच्या कुमारीला दुर्गा आणि दहा वर्षाच्या कुमारीला सुभद्रा याच्या वरच्या वयाच्या कुमारीचे पूजन करण्याचा प्रघात नाही. कुमारी पूजनाचे फळ असे आहे की, दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन शत्रूंचा नाश होते. यावरून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे महत्त्वदेखील अधोरेखित होते. फार पूर्वीची गोष्ट आहे. दक्षाच्या यज्ञामध्ये देवी भद्रकालीचा अवतार अष्टमीला झाला. तिचा आकार प्रचंड अवाढव्य होता आणि तिच्याच बरोबर असंख्य योगीनींचाही समावेश होता म्हणून अष्टमीला जो यज्ञ करण्याचा प्रघात आहे त्यात हवन ब्राह्मण भोजन कुमारिका भोजन फळ, फूल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दानांनी जगदंबेला प्रसन्न करण्यात येते तसेच ज्यांना नवरात्रात नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही, त्यांनी तीन दिवस उपवास करूनही त्यांना यथोचित फळ मिळू शकते. तसेच सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तीन रात्री उपाशी राहून देवीची पूजा केली, तर त्यांना फळ प्राप्ती होऊ शकते. देवीचे पूजन, होम, कुमारी पूजन आणि ब्राह्मण भोजन या चार प्रकारच्या कार्याने यथोचित पूजन केले, तर नवरात्राचे सांगोपांग व्रतपूर्ण होते, अशी आख्यायिका आहे. जगात जे काही अनेक व्रत किंवा अनेक दान आहेत त्यांची या नवरात्र व्रताशी तुलना कधीच होऊ शकत नाही. कारण हे व्रत धनधान्य, सुखसंपत्ती, पुत्रपौत्र, आरोग्यवर्धक आणि स्वर्ग व मोक्षाची प्राप्ती करून देण्यास समर्थ आहेत. ज्यांना विद्या, धन आणि पुत्र मिळण्याची इच्छा आहे, त्यांनी या सौभाग्यदायी मंगलमय व्रताचे अनुष्ठान मांडावे. विद्येची आवड असणाऱ्या मनुष्याने हे व्रत केल्यास त्याला विद्येची प्राप्ती होते. ज्याचे राज्य नष्ट झाले, त्याला पुन्हा राज्याची प्राप्ती होऊ शकते, असे वर्णन परमपावन अशा श्री देवी भागवतात केले आहे. श्री सप्तशती रचनेत मार्कण्डेय ऋषी काय म्हणतात-
“सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतन्वितः| मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः||”
जो कोणी भक्त या नवरात्रामध्ये या भगवतीचे मनापासून उपासना करेल, त्याला कुठलीच बाधा होणार नाही आणि त्याला या जन्मात धनधान्याची प्राप्ती होईल, यात काही संशय नाही. असे म्हणून सकल चराचर अजरामर भगवती देवीला माझा साष्टांग दंडवत असो!
“सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके| शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते||”

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
गडचिरोली, फक्त व्हॉटसॅप- ९४२३७१४८८३.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button