रेल्वे मध्ये भुसंपादित झालेल्या जमिनीची योग्य नुकसान भरपाई द्या
साखरा येथील पीडित शेतकऱ्यांची पत्रकार परिषदेतून मागणी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३ जानेवारी)
बहुचर्चित वडसा ते गडचिरोली ५२ किलोमीटर रेल्वेमध्ये जमीन भुसंपादित झालेली आहे. परंतु भुसंपादित झालेल्या जमिनीचा योग्य तो मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. रेल्वे मध्ये भुसंपादित झालेल्या जमिनीची योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेतून साखरा येथील पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.
पिडीत शेतकऱ्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे
¶¶¶
१) वडसा ते गडचिरोली रेल्वे लाईन मान्य झाल्यावर उपविभागीय अधिकारी, गडचिरोली यांचा अध्यक्षतेखाली दि. १०/१/२०१८ ला तसेच ३१/५/२०१८ ला सभा घेण्यात आली. सदर सभेमध्ये भुसंपादित झालेल्या जमिनीला एकरी ओलीताखाली १ करोड रुपये व कोरडवाहू ला ७४ लाख रु. भाव देण्याचे आश्वासन देऊन रक्कमेसकट यादी बनविण्यात आली व यादी मौजा साखरा येथील चावळीवर यादी प्रसिद्ध करण्यात आली तेव्हा रेट पटल्यामुळे लोकांनी जमीन भुसंपादित होण्यासाठी मान्यता दिली परंतु सन २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष रजिस्ट्री करतांना एकरी ओलीताखाली १२ लाख रुपये व कोरडवाहूला १० लाख रुपये प्रमाणे मोबदला दिला तेव्हा गाव वासीयांनी नकार दिला असता बळजबरी करून रजिस्ट्री करण्यात आली. तरी आमच्या शेतजमीनीला उपविभागीय अधिकाऱ्यांना सोबत झालेल्या बैठकांमध्ये ठरल्याप्रमाणे दर देण्यात यावा अशी मागणी पत्रकार परिषदेतून शेतकऱ्यांनी केली आहे.
२) अतिरिक्त गेलेल्या जमिनीचा सर्व्हे करून गेलेल्या जमिनीचा जुन्या रेट नुसार (१ करोड) रुपये मोबदला देण्यात यावा.
३) रेल्वेच्या रस्त्यावर मातीकाम झालेला असून मातीकामामुळे झालेल्या पिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये, प्रमाणे भरपाई देण्यात यावी,
४) रेल्वे चा काम सुरु असतांना शेतकऱ्यांची जागा गेलेली नाही अश्या शेतक-यांच्या जागेतून वाहन ये-आण करीत असल्याने लगतच्या शेतकऱ्यांच्या जागेत पोत खराब झाल्यामुळे सदर जागा पूर्ववत करून देण्यात यावी.
५) रेल्वे लाईन मातीकाम टाकीत असतांना शेतकऱ्यांच्या शेतातील लाईनचे पोल तुटल्यामुळे १२०२८ शेतकऱ्यांची भरपूर प्रमाणात नुकसान झालेली आहे. त्यामुळे पिकांना पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण झाल्यामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई म्हणून एकरी ५० हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
पत्रकार परिषदेला रोहिदास राऊत केंद्रीय उपाध्यक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष,वासुदेव गायकवाड, ज्ञानदेव मेश्राम,चिंदु गेडाम,आनंदराव भैसारे,नामदेव लोहर,उमाजी चुधरी, लोकेश भानारकर, सदाशिव डोईजड, कौशल्या उंदीरवाडे, नरेंद्र वालदे, कमल अंबादे,नरेंद्र उंदिरवाडे,रिता अंबादे,हरबाजी वालदे,दिनकर नैताम यांचेसह साखरा येथील अनेक पिडीत शेतकरी पत्रकार परिषदेला हजर होते.
