Uncategorizedआपला जिल्हा
महा अंनिस तर्फे एक दिवसीय कार्यशाळा व कार्यकर्त्यांचा शिबिर उत्साहात संपन्न
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,२६ जून)
महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोली चे वतीने एक दिवसीय कार्यशाळा तथा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शाल, शिल्ड व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यशाळा दोन सत्रात संपन्न झाली.

पहिल्या सत्राचे अध्यक्ष महा अंनिस चे जेष्ठ सल्लागार श्री देवाजी सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून मा पंडित पुडके, राज्य सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री चोपराम कांबळे, चंद्रपूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष श्री पुंडलिक जाधव, गडचिरोली शाखेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे, गडचिरोली शहर शाखेचे अध्यक्ष श्री शब्बीर शेख तर दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष मा पंडित पुडके प्रमुख मार्गदर्शक म्हणून महा अंनिस चे राज्य प्रधान सचिव श्री गजेंद्र सुरकार, जिल्हा माहिती अधिकारी श्री संजय अडसुळ, राज्य सहकार्यवाह श्री विलास निंबोरकर, मा पुंडलिक जाधव, विठ्ठलराव कोठारे आदी उपस्थित होते.
पहिल्या सत्रात विठ्ठलराव कोठारे यांनी संघटना बांधणी, दस्तऐवज संकलन यावर मार्गदर्शन केले, उपेंद्र रोहनकर यांनी विविध उपक्रमांविषयी माहिती दिली, प्रविण टेकाम यांनी युवकांचा सहभाग यावर विवेचन केले, प्रशांत नैताम यांनी बुवाबाजी संघर्ष विभागा विषयी माहिती देऊन बुवा बाबांच्या जाळ्यात कसे अडकतो हे चमत्कार दाखवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विलास निंबोरकर यांनी वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प, विज्ञान बोध वाहिनी व कार्यकर्त्यांनी आपले मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी व इतरांच्या मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी काय उपाय करावेत याविषयी विस्तृतपणे माहिती दिली. श्रीमती अंजूम शेख मॅडम यांनी महिलांचे सहभाग या विषयावर विविध दाखले देत आजही महिला अंंधश्रद्धांना कशा बळी जातात व स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता एनिमीया आजाराचे बळी राहूनही कसे कडक उपास तापास करतात आणि पुन्हा प्रकृती बिघडली म्हणून डॉक्टर कडे जाऊन ईलाज करतात यावर विस्तृतपणे माहिती दिली. पुरुषोत्तम ठाकरे यांनी सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागात चळवळीतील गाणे, रिंगणनाट्य, पथनाट्य व एकांकिका सादर करून अंंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कसा वापर करायचा यावर मार्गदर्शन केले व काही गीत सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
त्यानंतर मा सोनटक्के सर यांनी पहिल्या सत्राचे अध्यक्षीय भाषणात महा अंनिस द्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयीची माहिती जाणून घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचे गुणगौरव करण्यासाठी शब्द अपुरे पडतात अशा शब्दांत स्तूती केली. दुसऱ्या सत्रात मा जाधव सरांनी विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील महा अंनिस चे कार्य अव्वलस्थानी आहे असे तोंडभरून कौतुक केले. एकेकाळी चंद्रपूर जिल्हा आघाडीवर होता आणि गडचिरोली मध्ये फक्त दोनच कार्यकर्ते अंंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करीत असताना पाहिले आणि आज विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया व इतर जिल्ह्यांनाही मागे टाकत दर महिन्याला कोणते ना कोणते उपक्रम राबवित असतात याची दखल राज्य पातळीवर देखील घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे खूप कौतुक केले जाते असे मौलिक विचार मांडले.
गजेंद्र सुरकार यांनी महा अंनिसच्या कार्यप्रणाली विषयी विस्तृतपणे सखोल माहिती दिली. मा संजय अडसूळ यांनी गडचिरोली मध्ये अंंधश्रद्धा निर्मूलनाचे काम कसे सूरू आहे हे इतर मान्यवरांनी जे काही मत व्यक्त केले त्यावरुन कार्यकर्त्यांचे कौतुक तर केलेच पण गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण भागात अंंधश्रद्धांचे प्रमाण लक्षात घेता अजूनही मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी कार्यकर्त्यांना आहे असे मत व्यक्त केले. गडचिरोली जिल्ह्यातील उराडी शाखेचे अध्यक्ष श्री दादाजी गोपी बोरकर, गडचिरोली शहर शाखेचे अध्यक्ष श्री शब्बीर शेख व घोट येथील जिल्हा उपाध्यक्ष श्री चोपराम कांबळे यांनी अंंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे वर्गणीदार, देणगीदार जाहिरातदार मिळवण्यासाठी बरीच मेहनत घेऊन संघटनेसाठी आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन मा राज्य प्रधान सचिव श्री गजेंद्र सुरकार, जिल्हा माहिती अधिकारी श्री संजय अडसूळ व श्री पुंडलिक जाधव यांच्या हस्ते शाल, प्रशस्तीपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.



(श्री दादाजी बोरकर, शब्बीर शेख व चोपाराम कांबळे यांचा महा अंनिस तर्फे सत्कार करतांना मान्यवर गण)
महा अंनिस चे गडचिरोली शाखेचे जिल्हा अध्यक्ष श्री रोहिदास राऊत यांना काही पारिवारिक समस्येमुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्याने अनुपस्थितीबद्दल खंत व्यक्त करून कार्यकर्त्यांसाठी पाठविलेला शुभेच्छापर संदेश श्री विलास निंबोरकर यांनी उपस्थितांना वाचून दाखवला. त्यात त्यांनी महा अंनिस चे कार्य हे स्पृहणीय असून ते राष्ट्रीय कार्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हे या संघटनेचे ध्येय असून जे संविधानाच्या कलम ५१(अ) मध्ये समाविष्ट आहे हे काम कोणत्याही राष्ट्रभक्त समजणाऱ्या लोकांपेक्षा सरस आहे तेव्हा या कामाची दखल शासनाने घ्यायला हवी व शालेय शिक्षणात अंंधश्रद्धा निर्मूलन विषयाला प्राधान्य द्यायला हवे असे मत व्यक्त केले.
पंडित पुडके यांनी अध्यक्षीय भाषणात अंंधश्रद्धा निर्मूलनाचे काम कशाचीही अपेक्षा न बाळगता उलट जिवावर उदार होऊन करावे लागते हे अलिकडील डॉ नरेंद्र दाभोळकर, काॅ गोविंदराव पानसरे , डॉ एम एम कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्या उदाहरणावरून लक्षात येते. व हे काम कोणत्याही संकटाची पर्वा न करता गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्ते नेटाने करीत आहेत त्याबद्दल कार्यकर्त्यांचे गुणगौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम चौधरी व प्रा विलास पारखी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री वामनराव भोयर आणि गोविंदराव ब्राम्हणवाडे यांनी केले. प्रास्ताविक श्री विलास निंबोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री हरिदास कोटरंगे, मनोहर गोडसेलवार, पुरुषोत्तम चौधरी, पुरुषोत्तम ठाकरे, उद्धव बांगरे, सुनील नन्नावरे, महानंदा विलास निंबोरकर, उपेंद्र रोहनकर, विठ्ठलराव कोठारे, विलास पारखी, वामनराव भोयर यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला उराडी शाखेचे मोतीराम नहामुर्ते, गणपती चौधरी, कार्तिक दडमल , घोट शाखेचे आशिफ सैय्यद, हेमंत उपाध्ये, मुमताज सय्यद, काटली येथील देवेंद्र भोयर , कमलाकर वारके, रजिया उसेंडी, अंजली सोनटक्के, अर्चना राऊत, सुधाताई चौधरी, अल्का गुरनूले, मुकुंदा मेश्राम, संजय बोदलकर, विजय उरकुडे, आर एल मेश्राम, दिलीप मेश्राम ग्राम विकास अधिकारी, ज्योती आत्राम , सावली येथील नरेंद्र पाटील, कनेरी शाखेचे प्रभाकर लाकडे , सौ प्रभा लाकडे, संदिप कांबळे , प्रियंका निंबोरकर, पुजा तम्मेवार, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
जाहिरात
