गडचिरोली ची जनता पुरामुळे त्रस्त ; पालकमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पक्षाच्या कार्यक्रमात व्यस्त
महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा पालकमंत्र्याऱ्यावर निशाणा

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि,२९ जुलै)
गडचिरोली जिल्ह्यात मागील एक आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे, या पावसामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे,गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क मोट्या जिल्ह्याशी होऊ शकत नाही. गावात – शेतीत पुराचे पाणी शिरले असल्याने शेतीचे घराचे नुकसान झाले आहे, भामरागड तालुक्यात एका गरोदर महिलेला पूल नसल्याने जेसीबी च्या मदतीने नाला पार करावा लागला, कुरखेडा तालुक्यात सती नदी वरील रपटा वाहून गेल्याने त्या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
सर्पदंशा मुळे जखमी झालेल्या रुग्णाला दवाखान्यात जायला रस्ता नसल्याने त्याचा जीव गमवावा लागला, जिल्ह्यातील रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने अहेरी -सिरोंचा मार्गांवरील बस वाहतूक बंद आहे, अश्या प्रकारची जिल्ह्यातील विदारक परिस्थिती आहे. गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान हे दिल्ली येते अधिवेशन चालू असतांना देखील शनिवार- रविवार सुट्टी च्या दिवशी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागचा दौरा करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देत आहेत.
मात्र जिल्ह्याचे पालक असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र कुठे हरवले आहेत असा सवाल जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन जिल्ह्यातील जनतेला त्यांच्या मदतीची आज गरज असताना देवेंद्र फडणवीस पक्षाच्या बैठकीत व्यस्त असून त्यांनी जिल्ह्यातील जनतेला रामभरोसे सोडले असल्याचा आरोप देखील महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केला आहे.
