येवली – पोटेगाव क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची सोय करा : आमदार भाई जयंत पाटील यांची मागणी
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१ जानेवारी)
तालुक्यातील येवली, शिवणी, डोंगरगाव, हिरापूर, विहिरगाव, गुरवळा, मारोडा, सावेला, पोटेगाव या ग्रामपंचायत अंतर्गत गावांना जानेवारी ते जून महिन्यादरम्यान पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे हि टंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय करा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली.
सदर मागणी करतांना भाई जयंत पाटील यांनी सभागृहाला लक्षात आणून दिले की, पोटफोडी नदीच्या पाण्यावर यातील गावे अवलंबून आहेत. ही नदी सहामाही वाहत असल्याने दरवर्षी जानेवारी ते जून महिन्यादरम्यान पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा योजनांकरीता अपूरे पाणी उपलब्ध होवून मोठी पाणीटंचाई निर्माण होते.
सदरची पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशनच्या माध्यमातून या क्षेत्रात एकात्मिक पाणीपुरवठा योजनेला मंजुरी द्यावी व पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न सोडवावा अशी विनंतीही आमदार भाई जयंत पाटील यांनी सभागृहाला केली.
